मुंबई:- आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 95 वषय बाबा आढाव यांनी यासंदर्भातच आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहे. याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात ते झोपले असतील पण लोकशीहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरला आहे याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालंय, या विरोधात आवाज उठविणे गरजेचे?
दरम्यान, भाजप पक्षाला यांच्याकडून जे काम करायचं होतं ते करून झालंय. महाराष्ट्र त्यांनी कमजोर केला, राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन पक्ष फोडण्यासाठी यांची मदत घेतली आणि वापर केला. आता त्यांचं कार्य संपलं आहे. भविष्यामध्ये जर यांचे पक्ष फोडले आणि भाजपने बहुमत स्थापन केलं तर कोणाला आश्चर्य वाटणार नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.
देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाला. लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडुकीचा लगेच वेगळा निकाल कसा लागतो? असा सवाल करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं सांगत यांच्याविरोधात आवाज उठवण्याचं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.